॥नवचंडीची माहिती॥
१)नवचंडी कशी संपन्न होते ?
२)देवी शक्ती ?
३)सप्तशती माहिती ?
सप्त म्हणजे सात, शत म्हणजे शंभर स्त्रीलिंगी रूप-सप्तशती. सातशे श्लोकात्मक त्रिगुणात्मिका शक्तीचे महात्म्यवर्णन म्हणजे सप्तशती. व्यास ऋषींनी रचलेल्या अठरापुराणापैकी मार्कंड पुराणातील ८१ ते ९३ अध्यायामधे हे सातशे श्लोक आहेत. तसेच कवच, अर्गला, कीलक ही स्तोत्रे व तीन प्रकारची रहस्य आहेत. या सर्वांच्या एकत्रित पठणाला सप्तशती पाठ असे म्हणतात. असे दहा पाठ वाचून दोन पाठ हवनाचे म्हणजे एकूण बारा पाठ केल्यास पाठात्मक नवचंडी संपन्न होते. म्हणजे काही ठिकाणी हवन करणे अशक्य असते, पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने असे केले जाते. नवचंडी करताना खूप विषय असतात. त्यातील महत्वाचे विषय पाहू. १)पंचगव्य प्राशन– शरीर शुद्धीसाठी. २) संकल्प– जो हेतू मनात ठेउन हे कार्य करणार त्याचा उच्चार करणे म्हणजे संकल्प. ३)गणेशपूजन-योजिलेले कार्य निर्विघ्नपणे पूर्ण होण्यासाठी गणेशपूजन केले जाते. ४)पुण्याहवाचन-आजच्या कार्यासाठी योजलेला हा दिवस पुण्यकारक असो. असे आलेल्या गुरूजींकडून आशीर्वाद घेणे. ५) मातृकापूजन– आपल्या हातुन नकळत जी हिंसा होते त्यामुळे जे दोष निर्माण होतात त्याच परिमार्जन होण्यासाठी हे मातृकापूजन केले जाते. ६) नांदीश्राद्ध-आपल्याला पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी जे मांगलिक श्राद्ध केले जाते त्याला नांदीश्राद्ध असे म्हणतात. ७)पुढील कार्य संपन्न होण्यासाठी आलेल्या गुरूजींची नियुक्ती केली जाते. त्याला आचार्यवरण असे म्हणतात. त्यानंतर वास्तुशुद्धी केली जाते. (क्र १ ते ७ या विषयांची अधिक माहिती अनुक्रमणिकेत गणेशपूजन, पुण्याहवाचन, मातृकापूजन, नांदीश्राद्ध या विषयात पहावी.
॥मुख्यदेवता स्थापन ॥
त्यानंतर मुख्यदेवता म्हणजे आपल्या कुलदेवतेचे आवहन करण्यात येते. त्याआधी आधार देवता ब्रह्मादिमंडल देवतांचे पूजन करून त्यावर धान्य (तांदूळ-गहू इ.) घालून त्यावर कलश ठेउन त्याला (सुंदर साडी नेसवून) त्यावर पूर्णपात्र (ताम्हन) ठेउन त्यामधे तांदुळ घालून देवीच्या मूर्तीवर देवीचे आवाहन केले जाते. मूर्ती नसल्यास सुपारीवरती देवीचे आवाहन केले जाते. आवाहन झाल्यावर देवीची १६ उपचारांनी पूजा केली जाते. त्यावेळी देवीस्तुतिमंत्रांनी अभिषेक केला जातो. यानंतर यजमान-दंपती यांच्याकडुन देवीच्या १०८ नावांनी देवीला १०८ वेळा कुंकु अर्पण करतात त्याला कुंकुमार्चन असे म्हणतात. नंतर हवनासाठी अग्निचीस्थापना करून नवग्रहमंडल देवतांचे आवाहन पूजन केले जाते. नंतर हवनाला प्रारंभ होतो.
॥ग्रहमंडल॥
प्रथम ग्रहमंडल देवतांसाठी समिधा, तिळ व तूप यांनी हवन केले जाते. सप्तशतीमधील ७०० श्लोकांचे संमिश्रद्रव्याने (पायस, तिळ, पळसाचीफ़ुले, पिवळी मोहरी, सुपारीचे तुकडे, लाह्या, , दूर्वा, जव, बेलाचेफ़ळ, रक्तचंदन, गुग्गुळ, उसाचे-तुकडे, इ. एकत्र करून) हवन केले जाते. किंवा तिलमिश्रितपायस द्रव्याने हवन केले जाते. नंतर कुलदेवतेसाठी तर्पण, मार्जन केले जाते.
॥बलिदान॥
ज्याकाही वाईट शक्ती आहेत. त्यांच्यापासून त्रास न होण्यासाठी आपल्या जागेच रक्षणकरणारी क्षेत्रपाल देवता त्याच पूजन करून त्याला भात, उडीद याचा किंवा तांदुळ, उडीद याचा बलि दिला जातो. याला बलिदान असे म्हणतात.
॥पूर्णाहुती॥
यानंतर कर्माची सांगता म्हणून पूर्णाहुती दिली जाते. देवीसाठी विशेष बलि म्हणून कूष्मांड(कोहाळा) बलि दिला जातो. यानंतर यजमान-दंपती व घरातील मंडळी यांच्यावर अभिषेक केला जातो. कुलदेवीस्वरूप-कुमारिका, सुवासिनी यांचे पूजन केले जाते. यात कुमारिका १० वर्षा पर्यंत असावी कुमारिकांना त्यांच्या वयाप्रमाणे वेगवेगळी नावे आहेत
दोन वर्षाची – कौमारी.
तीन वर्षाची – त्रिमूर्ति.
चार वर्षाची – कल्याणी.
पाच वर्षाची – रोहिणी.
सहा वर्षाची – कालिका.
सात वर्षाची – चंडिका.
आठ वर्षाची – शांभवी.
नऊ वर्षाची – दुर्गा.
दहा वर्षाची – सुभद्रा.
अशी नावे आहेत. या प्रमाणे त्या मंत्राने कुमारिकेचे पूजन केले जाते.
यानंतर मुख्य गुरूजी अग्निपूजन व विभूती धारण करून घेतात. व यजमानांकडून करवून घेतात. त्यानंतर हा सर्व कार्यक्रम संपन्न केल्याबद्दल मुख्यगुरूजींना गोप्रदान केले जाते. (प्रत्यक्ष शक्य नसल्याने दक्षिणेच्या स्वरूपात दिली जाते. व आलेल्या बाकी पुरोहितांना दक्षिणा दिली जाते. हे झाल्यानंतर सर्व गुरूजी आशीर्वाद मंत्र म्हणून यजमानास फ़लरूपाने आशीर्वाद देतात. घरातील सर्व मंडळी, आलेली मंडळी सर्वजण देवीची आरती,मंत्रपुष्पांजली म्हणून देवीच्या चरणाशी पुष्पांजलि अर्पण करतात. देवीची प्रार्थना केली जाते. यानंतर शक्य असल्यास ब्राह्मण भोजन, सुवासिनी, कुमारिका यांना भोजन दिले जाते. ही सर्वकृत्ये नवचंडी या प्रयोगामध्ये असतात. याला पंचांगपुरश्चरण असेही म्हणतात.
नवचंडी असे नाव असुनही दहा पाठ का करतात?
नवचंडी यातील “नव” हा शब्द नवदुर्गावाचक आहे.
शैलपुत्री
ब्रह्मचारिणी
चंद्रघंटा
कूष्मांडा
स्कंदमाता
कात्यायनी
कालरात्री
महागौरी
सिद्धिदात्री
ही सर्व नवदुर्गांची नावे होय. त्यावरून नव हा शब्द आलेला
आहे.
१) प्रथम सांगितल्याप्रमाणे शंभर पाठ करून दहा पाठांचे हवन केल्यास एक शतचंडी संपन्न होते.
२) याप्रमाणे एक हजार पाठ करून शंभर पाठांचे हवन केल्यास एक सहस्रचंडी संपन्न होते.
३) असे दहा हजार पाठ करून एक हजार पाठांचे हवन केल्यास एक अयुतचंडी संपन्न होते. आणि विशेष पाठ वाचून झाल्यावर कुंजिकास्तोत्र वाचणे अत्यावश्यक आहे. कारण त्यामधे असे सांगितले आहे
॥ न तस्य जायतेसिद्धिर्अरण्ये रुदितं यथा ॥
म्हणजेच पाठ वाचन झाल्यावर कुंजिकास्तोत्र न म्हटल्यास अरण्यात जाउन ओरडण्यासारखे आहे. या त्रिगुणात्मका शक्तींची सत्व, रज, तम गुणानुसार तीन रूपे आहेत.
1) सत्व- सरस्वती.
शांतमुद्रा, शुभ्रवस्त्रधारण, प्रसन्न मुखकमल, सात्विक वातावरण.
2) रज- महालक्ष्मी.
अनेकप्रकारची आयुध(शस्त्र) धारण, सर्व अलंकारांनी युक्त.
तम- महाकाली- भीषण स्वरूप, राक्षसांच्या मुडक्यांची माळ धारण करून निळ्या रंगाचे वस्त्र नेसुन उग्र चेहर्याची व क्रोधाचा आविष्कार दिसुन येणारी . प्रत्येकाच्या शरीरात या तीनहि शक्ती कार्यरत असतात. मनुष्यासंबंधी बोलावयाचे झाल्यास आपले ध्येय साध्य करण्यासाठी सत्व, रज, तम गुणांचा वापर करावा लागतो. म्हणजेच काहिगोष्टी शांतपणे पटवून दिल्याने साध्य होतात. तर काहिगोष्टी राग आल्यानंतर शारीरिक बळ दाखविल्यानंतर प्राप्त होतात. हेच कथारूपाने सप्तशतीत सांगितले आहे.
~पहिला अध्याय – महाकाली चरित्र.
~दोन,तीन,चार अध्याय – महालक्ष्मी चरित्र.
~पाच ते दहा अध्याय – महासरस्वती चरित्र.
~अकराव्या अध्यायात नारायणी स्तुती आहे. म्हणजे ज्या श्लोकांचे शेवटचे चरण ॥ नारायणी नमोस्तुते ॥ असे आले आहे.
~बाराव्या अध्यायात सप्तशती पाठाची फ़लश्रुती आली आहे.
~तेराव्या अध्यायात सुरथ राजाला व समाधी वैश्याला देवीचा आशीर्वाद प्राप्त झाला आहे.
कथा थोडक्यात अशी – या सप्तशतीच्या श्लोकांमध्ये ऋषी म्हणून ज्यांचा उल्लेख येतो. त्यांचे नाव भागुरी अथवा क्रौष्टुकी असे आहे. प्रापंचिक समस्यांनी ग्रासलेले राजा व वैश्य ऋषींच्या आश्रमात आले. त्यांच्या आश्रमात भिन्न प्रवृत्तिचे पशु-पक्षी न भांडता राहत असत. असा आश्रम पाहिल्यावर सुरथ नावाचा राजा व समाधी नावाचा वैश्य दोघे आश्चर्यचकित झाले. सुरथ राजाचे मंत्री, प्रधान, सेनापती इ. फ़ितुर झाल्यामुळे सुरथ राजाचा पराभव होतो. म्हणून निराश मनाने राजा विचार करत होता. की ज्यांना इतकी वर्ष मान-सन्मान, धन-संपत्ती दिली ते लोक माझ्या विरोधात कसे जाऊ शकतात? थोड्याफ़ार फ़रकाने समाधीवैश्याच्या घरीसुद्धा अशीच परिस्थिती होते. ज्या मुलांना ममत्वबुद्धीने सांभाळले त्यांचाच त्याग करण्याची वेळ यावी हे केवढे दुर्दैव! अशा परिस्थितीत त्यांनी ऋषिंची भेट घेतली. ऋषींनी त्यांना त्यांच्या अज्ञानामुळे त्यांच्यावर असलेले मायेचे आवरण काढून टाकण्याच्या हेतुने माया काय असते? हे समजाविण्याकरिता अनुक्रमे महाकाली-महालक्ष्मी- महासरस्वती यांच्या पराक्रमाने परिपूर्ण असे चरित्र सांगितले. व मायाभेद करून राजा व वैश्य यांना देवीच्याकृपेने पूर्ववत सुखप्राप्ती करवून दिली. महाकाली चरित्रात मधुकैटभ नामक राक्षसांचे वर्णन व त्यांच्या संहाराचे वर्णन आहे. हे मधुकैटभ विष्णुच्या कानातील मळापासून निर्माण झाले होते. तमोगुणाचे प्रतीक असलेली निहाजिची माया महाविष्णुंवर होती. ती माया महाकालीने काढून घेतली व महाविष्णुंना जागृत केले. नंतर महाविष्णुंनी मधुकैटभाचा वध केला व श्रुतिधर्माचे(वेदधर्माचे) रक्षण केले. दुसर्या अध्यायापासुन चार अध्यायांपर्यंत राक्षसांमधील वाढत्या शक्तीचा प्रतिकार करण्यासाठी विविध देवतांनी स्वत:कडील विविध शक्ती एकत्र करून एक परिपूर्ण आदिशक्ती मूर्ती निर्माण केली. तिचे नाव महालक्ष्मी. कोणत्या देवतांनी काय-काय दिले याचे वर्णन दुसर्या अध्यायात आहे. इंद्र, अग्नि, यम,वरूण, सूर्य, ब्रह्मा यांनी आपापली आयुधे तसेच उपयोगी गोष्टी देऊन तिला संपन्न बनविले. अशा सर्व शक्ती आयुधांनी सज्ज झालेल्या महालक्ष्मीने महिषासुर नामक राक्षसाचा व चिक्षुर, चामर, उदग्र, महाहनु अशा नावांनी प्रसिद्ध असलेल्या दैत्य सेनापतिंचा पराभव केला. यांची संख्या अब्जावधीने होती. असेही वर्णन सप्तशतीमध्ये आहे. या युद्धात फ़क्त महालक्ष्मीनेच युद्ध न करता तिचे वाहन असलेला सिंह यानेही युद्धात सक्रिय सहभाग घेउन अतिशय भीषण संहार केला. व महालक्ष्मीने सर्व देवतांना दैत्यांच्या आक्रमणापासुन वाचविले. संघटितपणे कार्य केल्यास कसा विजय प्राप्त होतो याचे हे चरित्र उत्तम उदाहरण आहे. यापुढील महासरस्वतीचे चरित्रही इतकेच अद्भुत आहे. याप्रमाणे देवतांची उत्क्रांती होत होती. तशीच ती असुरांकडेही होत होती. किंबहुना देवांच्या अगोदर असुरच बुद्धीचा वापर फ़क्त देवतांना त्रास देण्यासाठी करत असत. सांप्रतही पाहिले असता, रोग आधि बलवान होतात. मग त्यावर औषध शोधले जाते. देवीचे-पार्वतीचे सुंदररूप चंड-मुंड नामक राक्षसांच्या दृष्टीस पडले. त्यांनी त्यांच्या शुंभ नावाच्या मोठ्या दैत्यास तिचे वर्णन करून ती देवी आपल्याला प्राप्त व्हावी अशी इच्छा शुंभाच्या मनात उत्पन्न केली. देवीनेही जो मला युद्धात जिंकेल तोच माझा पती होईल अशी अट घातल्याने शुंभ-निशुंभाबरोबर या देवीचे युद्ध झाले. या युद्धात धूम्रलोचन तसेच स्वत: चंड-मुंड, उदायुध, कंबु, पोटिवीर्य, कालकेय अशा वेगवेगळ्या नावाच्या राक्षसांबरोबर देवीचे युद्ध झाले. या देवीला सहाय्य करण्यासाठी ब्रह्म-शंकर- कार्तिकेय- विष्णु-इंद्र यांच्या शक्ती म्हणजेच ब्रह्माणी, माहेश्वरी, कौमारी, वैष्णवी, इंद्राणी, नारसिंही, ऎंद्री अशा सर्व देवता एकत्र आल्या व त्यांनी आपापल्या आयुधांनी दैत्य सेनेचा संहार केला. रक्तबीज नावाच्या असुराचे वर्णन या ग्रंथात येते. याचे वैशिट्य म्हणजे त्याच्या शरिरातून जेव्हा रक्ताचा थेंब जमिनीवर पडत असे त्यावेळी त्याच्यासारखा दुसरा राक्षस उत्पन्न होत असे. रक्ताच्या थेंबापासुन पूर्ण शरीर निर्माण करण्याचे तंत्र जे आजच्या विज्ञानाला अजुनही अशक्य आहे. ते त्याकाळी राक्षसांनी वापरले होते. याला मारले तरी समस्या आणि जिवंत ठेवले तरी समस्या त्यामुळे तो रक्तबीज सर्व शक्तींना-देवीला एकट्याने गाठून लढाई करू लागला. तेव्हा चंडिका नावाची देवता महाकालीला म्हणाली हे महाकाली तुझा जबडा जेवढा मोठा होईल तेवढा मोठा कर आणि या सर्व रक्तबिंदुंपासून निर्माण झालेल्या सर्व राक्षसांना खाऊन टाक. असे केल्याने पुन्हा दैत्य निर्माण होणार नाहीत. हा उपाय लागू पडला. आणि दैत्यांची पुनर्निमिती थांबली. त्यामुळे रक्तबीज शक्तिहीन होवून जमिनीवर कोसळला. मग निशुंभाचे युद्ध, नंतर शुंभासोबत असे एकेका युद्धाची वर्णने आहेत, जीयुद्धे केवळ भूमीवर लढली न जाता आकाशातही लढली गेल्याची वर्णने यात आली आहेत. अशा प्रचंड दैत्य संहारानंतर देवगण(सर्व देवता) आनंदी झाले. त्यांनी नारायणी स्तुती केली. अशाप्रकारे महाकाली- महालक्ष्मी- महासरस्वतीचे चरित्र आपल्यासमोर येते. मानवी जीवन हेही युद्धाप्रमाणे असल्याने क्रोध, लोभ,अहंकार इ. जवळ वावरणारे जे शत्रू आहेत त्यांच्यावर विजय मिळविण्याकरता कधी तमोगुणाचा तर कधी रजोगुणाचा तर कधी सत्वगुणाचा वापर करायचा असतो. या देवीमाहात्म्य पठणाचे ऎहिक व पारमार्थिक लाभ काय आहेत ते १२ व्या अध्यायात सांगितले आहे. विशेषत: अष्टमी, नवमी, चतुर्दशी या तिथी देवीला प्रिय आहेत. शारदीय नवरात्र व कुलदेवींचे उत्सव या प्रसंगी कुलदेवतेची सेवा म्हणून चंडी पाठ करण्याची प्रथा आहे. पाठवाचनाचे तीन प्रकार आहेत. १)साधा पाठ- पुर्वांग, क्रमाने ७०० श्लोक वाचन, उत्तरांग, तीन रहस्य व कुंजिका स्तोत्र वाचन असा पाठ वाचला जातो त्याला साधा पाठ असे म्हणतात. २)पल्लवित पाठ- पुर्वांग, नंतर जे ७०० श्लोक आहेत त्यामधे प्रत्येक श्लोकानंतर असे ७०० श्लोकांचे वाचन, उत्तरांग, तीन रहस्ये व कुंजिका स्तोत्र असा जो पाठ करतात त्याला पल्लवित पाठ म्हणतात. यामधे एकूण १४०० श्लोकांचे वाचन होते. ३)संपुटीत- संकल्प, पुर्वांग, नंतर जे ७०० श्लोक आहेत त्या प्रत्येक श्लोकाच्या आधी व नंतर १ वेगळा मंत्र म्हणावयाचा असतो. नंतर उत्तरांग, तीन रहस्य, कुंजिका स्तोत्र असा जो पाठ करतात त्याला संपुटित पाठ म्हणतात. यामधे २१०० श्लोकांचे वाचन असते. जो मनात हेतू असतो त्यावरून कोणता मंत्र त्या कामासाठी उपयुक्त आहे ते ठरवावे लागते. त्याची तीव्रता किती आहे त्यावरून साधा, पल्लवित, संपुटित यांपैकी कोणता पाठ करायचे ते ठरते.
त्यामधील काही मंत्र पाहू :-
1) अपमृत्यु निवारणासाठी – त्र्यंबकं यजामहे या० मंत्राचा पल्लव लाऊन पाठ वाचावा. असे १०० पाठ वाचावे.
2) सर्व आपत्ती जाण्यासाठी – दुर्गेस्मृता हा० मंत्र घ्यावा.
3) रोग-व्याधी दूर होण्यासाठी – रोगानशेषान्० मंत्र घ्यावा.
4) सुविद्या प्राप्त होण्यासाठी – इत्युक्ता सा तदा देवी० हा मंत्र घ्यावा.
5) सर्व मंगल होण्यासाठी – सर्व मंगलमांगल्ये० हा मंत्र घ्यावा.
6) देवीची कृपा प्राप्त होण्यासाठी – शरणागत दीनार्त० हा मंत्र आहे.
7) मुलांचे लग्न ठरण्यासाठी – पत्नीं मनोरमां देही० हा मंत्र आहे.
असे खूप मंत्र आहेत.
दुर्गा सप्तशती पाठ केल्यावर अगणित पुण्य मिळते. शिवाय प्रत्येक अध्याय पठणाचे फळ वेगवेगळे आहे..
१) पहिला अध्याय :- पहिला अध्याय भक्तिपूर्वक पठण केल्यास सर्व चिंता दूर होतात , शक्तिशाली शत्रूचा नाश होतो , शत्रू भय नाहीसे होते .
२) दुसरा अध्याय :- दुसरा अध्याय पठण केला असता शत्रूकडून बळजबरीने बळकावले घर , जागा , जमीन मुक्त होते .
३) तिसरा अध्याय :- तिसरा अध्याय पठण केला असता युद्धात विजय मिळतो , कोर्ट कचेरी , कज्जे , यात विजय होतो !
४) चौथा अध्याय :- चौथा अध्याय पठण केला तर धन मिळते , सुंदर जीवनसाथी मिळतो , व देवी भक्तीचा लाभ मिळतो !
५) पाचवा अध्याय :- पाचवा अध्याय पठण केला तर भक्ती वाढते , भीती नाहीशी होते , भीतीदायक स्वप्न बंद होतात . प्रेतबाधा , भूतबाधा दूर होते .
६) सहावा अध्याय :- सहावा अध्याय मनःपूर्वक पठण केल्यास सर्व संकटे दूर होतात व सर्व मनोकामना पूर्ण होतात .
७) सातवा अध्याय :- सातवा अध्याय पठण केला तर मनात आणलेले काम पूर्ण होते , काही गुप्त हेतू असतील तर ते तडीस जातात !
८) आठवा अध्याय :- धन लाभ होतो , इतरांना वश करता येते . अधिकार प्राप्त होतात !
९) नववा अध्याय :- नववा अध्याय पठण केला असता हरवलेले सापडते , व धनसम्पदा मिळते !
१०) दहावा अध्याय :- धाव अध्याय पठण केला तर , आप्त स्वकीय काही कारणाने बेपत्ता असतील तर परत येतात , मुलाबाळांचे सुख प्राप्त होते !
११) अकरावा अध्याय :- अकरावा अध्याय मनःपूर्वक पठण केल्यास व्यापार , धंदा यात मोठा लाभ मिळतो , कर्ज बाजारीपणा नाहीसा होतो , सुख सम्पत्ती मिळते !
१२) बारावा अध्याय :- बारावा अध्याय पठण केला तर रोगराई पासून सुटका होते , आरोग्य लाभते , निर्भरता येते व समाजात मान सन्मान मिळतो !
१३ ) तेरावा अध्याय :- तेरावा अध्याय मनःपूर्वक पठण केल्यास मातेचा आशीर्वाद लाभतो , धनसम्पदा , सुख समृद्धी मिळते